तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा-केव्हा ह्या संतमंडळींची पंगती उठतात तेव्हा त्यांच्या उष्टावळीचे मी मन निवेपर्यंत सेवन करतो. त्यासाठी त्यांनी टाकलेल्या सर्व पत्रावळी मी जमा करून त्यातील उच्छिष्टाचा मी चांगलाच समाचार घेतो आणि त्यातील त्यांचे राहिलेले उच्छिष्ट सेवन करतो.
आणि तसे करताना मी कोणत्याही सोवळ्या-ओवळ्याचा विचार करत नाही. किंबहुना त्यापासून मी आता फारकत घेतलेली असून मी त्यापासून सर्वतोपरी निराळाच झालो आहे. किंबहुना अशा या गोष्टींपासून मी फार दूर निघून गेलो आहे.
ते म्हणतात आजकाल मला परमार्थ आणि त्याविषयी नेमके काय केले पाहिजे हे आता सांगावे लागत नाही. कारण खुद्द नारायणच माझा आता गुरु झाल्याने तोच मला हे सर्व ज्ञान देऊ करत असतो. किंबहुना अशा या पारमार्थिक ज्ञानाचे मला त्याकडूनच शिकवण मिळत आहे.
किंबहुना या प्रकृतीतील आणि प्रकृतीपल्याड(परेपलीकडचे) ज्ञान हल्ली तोच मला देत असतो. एवढेच नव्हे तर द्वैत आणि अद्वैताचे ज्ञान देखील तोच मला देऊ करत असल्याने दुसऱ्याचे म्हणजे द्वैताचे, दुजाभावाचे अज्ञान माझ्या चित्ताला आता शिवत देखील नाही.
त्यामुळे माझ्या ठायी असलेला आप-पर भाव देखील संपुष्टात आला असून आपले-परके हे मी आता जाणत देखील नाही. सर्वकाही मला आता एक झाले असून त्यायोगे एकतत्व योग देखील चांगलाच कळून चुकला आहे.
किंबहुना ह्या एकतत्वाचा संकेत वा या संकेताची खूण कळून चुकल्यामुळेच माझ्यातील सर्व भेदाभेद देखील संपुष्टात आले आहेत. आणि माझ्यासाठी सर्वकाही आता हरीमय झाले आहे.
आणि त्यामुळेच माझ्या वागण्या-बोलण्यावर देखील त्याचा प्रभाव पडल्यामुळे माझ्याठायी तुम्हाला हा पालट दिसून येत आहे.
तुकोबाराय शेवटी म्हणतात आणि याविषयी येथे कोणीही मनी शंका बाळगू नये, कोणतीही आशंका धरू नये. कारण मी जे काही सांगात असून ते सर्व सत्यवचन आहे.
त्यामुळे मला आता केवळ संतांच्या उच्छिष्टाची चाड राहिलेली असून त्यांच्याच एका उच्छिष्टाची आस आहे. आणि त्यासाठी माझे मन आता सदैव आसुसलेले असते.
किंबहुना ते एवढे लांचावले असते की संधी मिळताच अशा या संतांच्या पंगतीला जाऊन मी आधीच हजर होतो आणि तेथे त्यांनी टाकलेले अन्न एखाद्या लोभ्याप्रमाणे ग्रहण करतो. किंबहुना एखाद्या पशूप्रमाणे त्यावर झडपच घालतो. आणि माझी त्याप्रति असलेली ही तीव्र इच्छा पाहून नारायण देखील माझे सर्व कोड अगदी कौतुकाने पुरवितो.
अभंग १४
Show Less
Comments
Good
Nice